डॉ. गिरीधर करजगावकर यांनी ‘प्राणायाम – ज्ञान व विज्ञान’ हे प्राणायामाबद्दल सखोल माहिती देणारे पुस्तक लिहिले आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हा अष्टांग मार्ग आहे. प्राणायामाचे ज्ञान मिळवत असताना या अष्टांग मार्गाचे मूलभूत ज्ञान मिळविणे आवश्यक आहे. त्यापैकी ‘यम’ या मार्गाची माहिती देणारा या पुस्तकातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत. ........
प्राचीन भारताने संपूर्ण जगासाठी आदर्श जीवनपद्धती सांगितलेली आहे. निदान भारतात तरी ही जीवनपद्धती जगणे अद्यापही शक्य आहे. आजच्या धकाधकीच्या गतिमान जीवनात ही जीवनपद्धती अनुसरणे शक्यच नाही, असे आपण मुद्दाम म्हणतो. प्रत्यक्षात आपण कधीही तसे जगून पाहिलेले नाही. तसे जगायचे म्हटले, तरी त्याविषयी माहिती नाही. या आदर्श जीवनपद्धतीला प्राचीन ऋषीमुनींनी ‘अष्टांगमार्ग’ किंवा ‘अष्टांग योग’ असे म्हटले आहे. पातंजल मुनींनी अष्टांग योगाविषयीची सर्व विखुरलेली सूत्रे एकत्र केली. जेथे आवश्यक आहे तेथे स्वत: नवीन सूत्रांची भर घातली आणि योगसूत्रे तयार केली. या ‘पातंजल योगसूत्रा’त जीवनाचा एवढा व्यापक आणि एवढा साकल्याने विचार केलेला आहे की, या योगग्रंथाला सारे जग भारतीय मानसशास्त्र म्हणून ओळखते.
प्राणायामाचे ज्ञान मिळवत असताना या अष्टांग मार्गाचे मूलभूत ज्ञान मिळविणे आवश्यक आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांपैकी आपण यम या पहिल्या अंगाविषयी माहिती घेऊ.
यम : मी इतरांसोबत कसे वागावे याविषयीची आचारसंहिता म्हणजे ‘यम.’ आपण, आपला परिवार, आपले नातलग, समाज, गाव, शहर, प्रांत, देश यांच्यासह सभोवतालच्या सर्व प्रकारच्या सजीव आणि निर्जीव वस्तूंसोबत आपले आचरण कसे असावे, याविषयी ‘यम’ या प्रकरणात माहिती दिलेली आहे. तिचे पाच प्रकार सांगितलेले आहेत.
अहिंसा : पहिला यम ‘अहिंसा’ हा आहे. आपल्यामुळे कुणालाही शारीरिक, मानसिक आणि वाचिक दु:ख किंवा इजा होऊ नये म्हणजेच अहिंसा. अहिंसा म्हणजे हिंसा होऊ न देणे. हिंसा तीन प्रकाराने होते.
कृत - आपण स्वत: केलेली हिंसा.
कारक - ज्याला आपण कारणीभूत असतो.
अनुमोदित - जी हिंसा आपण केलेली नाही किंवा ज्या हिंसेला आपण कारणीभूतही नाही, परंतु ज्या हिंसेला आपले प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असे अनुमोदन आहे, अशी हिंसा.
एक साधे उदाहरण देता येईल. घरी पाहुणा आलेला आहे. जेवायची वेळ झालेली आहे. पाहुणा भुकेला आहे. त्याला भूकही लागलेली आहे; पण तुम्ही काही कारणाने घरी नाही. पाहुणा आदरापोटी तुमची वाट पाहतो आहे. ‘तुम्ही आलात म्हणजे सोबतच जेवू,’ असे म्हणतो आहे. हे जे तुम्ही त्याला वाट पाहायला लावत आहात, असे वाट पाहायला लावणे हीसुद्धा एक प्रकारची हिंसाच आहे. म्हणजे त्याचा तर बळजबरीचा संयम होतो आहे; पण तुम्ही मात्र हिंसा करीत आहात.
शारीरिक अहिंसा म्हणजे आपल्याकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हिंसा होऊ न देणे. मानसिक अहिंसा म्हणजे कुणाबद्दलही द्वेष, क्रोध किंवा कोणत्याही प्रकारची वाईट भावना न बाळगणे. वाचिक अहिंसा म्हणजे वादविवाद, निंदा, नालस्ती न करणे.
एका वाक्यात सांगायचे म्हणजे, ‘दुसऱ्याला दु:ख न पोहोचवणे म्हणजे अहिंसा.’ अहिंसेचे पालन केले म्हणजे तुमचा व दुसऱ्याचा जो मानसिक पातळीवरचा संबंध आहे तो संबंध कमीत कमी होतो. अहिंसेचे आपल्या दैनंदिन जीवनात पालन करता येणे शक्य आहे. त्याचा आपल्याला फायदा आहे. कारण जेवढी अहिंसा अधिक, तेवढी तुमच्या जीवनात शांतता अधिक. वरीलपैकी कोणत्याही एखाद्या प्रकाराने अहिंसेचा भंग होतो, तेव्हा तुमच्या स्मृतीत त्याचे मूळ कारण कायमस्वरूपी घर करून राहते. वारंवार त्या घटनांची आठवण येत राहते. यातून तुमची मन:स्थिती बिघडते. बेचैनी, मानसिक तणाव या गोष्टींचा यातूनच जन्म होतो आणि परिणामी, आजार निर्माण होण्याची पार्श्वभूमी तयार होते. आजाराला निमंत्रण मिळते.
(डॉ. गिरीधर करजगावकर यांनी लिहिलेले ‘प्राणायाम – ज्ञान व विज्ञान’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)